Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

           कै. विनायकराव पाटील
मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली. खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटील यांचा आज स्मृतिदिन.कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी या खेड्यात 1 सप्टेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे वडील कै. पांडुरंगराव जाधव हे प्राथमिक शिक्षक होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती. विनायकराव लहानपणापासूनच रोखठोक व स्वाभिमानी बाण्याचे होते. ज्ञान  संपादनासाठी त्यांनी जिवाचे रान केले. एलएलबीची पदवी मिळवून ते बॅरिस्टर झाले. मात्र वकिली व्यवसायापेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. खूप अनुभव घेतले, माणसे जोडली. अनेक कटू अनुभव पचवले; परंतु कडवट भावना मनात रुजू दिली नाही. त्यांच्या विचारांवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण   यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. ते यशवंतरावांच्या पुरोगामी नेतृत्वाकडे आकर्षिले गेले. महाराष्ट्रात तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले.

निकला था जानिबे मंजिल अकेला।
लोग जुडते गये कारवाँ बनता गया।
याप्रमाणे विनायकरावांच्या रूपाने मराठवाड्याची अस्मिता घेऊन उमदे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदयाला आले. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचा कायापालट करावयाचा असेल तर शिक्षणासारखे प्रभावी दुसरे साधन नाही, हे त्यांनी ओळखले. 14 सप्टेंबर 1958 रोजी यशवंतरावांच्या प्रेरणेने त्यांनी आपले सहकारी दादासाहेब सावंत व इतर सच्च्या निष्ठावान सहका-यांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील गोरगरिबांची, शेतक-यांची, शेतमजुरांची मुले शिकावीत, त्यांना रोजी-रोटी मिळावी, सन्मानाने जगता यावे यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आज मधुकरराव मुळे यांच्या नेतृत्वाखाली या शिक्षण संस्थांचे जाळे मराठवाड्यात सर्वदूर पसरलेले आहे. 1962 मध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.
विनायकरावांसारख्या तरुण कार्यकर्त्यावर महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी यशवंतरावजींनी टाकल्यामुळे अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती; परंतु पुरोगामी विचारसरणीच्या आणि तत्त्वनिष्ठ विनायकरावांनी काँग्रेस कार्यकर्ते व युवकांना नवी दिशा दिली. 1967 मध्ये वैजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. शिक्षण क्षेत्रावरील प्रेम व निष्ठा, तसेच सहकारी जीवनपद्धतीवर त्यांचा ठाम विश्वास होता. वैजापूरसारख्या दुष्काळी भागातील शेतक-यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. नांदूर-मधमेश्वर, मन्याड, शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शेतक-यांना मिळावे म्हणून मोलाचे प्रयत्न केले.
ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध उत्पादक संस्था, सहकारी बँकांना बळकटी देऊन समाजोन्नतीसाठी दूरदृष्टी दाखविली. कोणतेही पद सेवेसाठी असते याची प्रचिती सर्वांना आणून दिली.

मराठवाड्यातील अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून नावाजलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना माजी मंत्री कै. विनायकराव पाटील व कै. दादासाहेब सावंत यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत केली. मराठवाड्यासारख्या सामाजिकदृष्ट्या अविकसित भागाला सर्वांगिण व सार्वत्रिक शिक्षण देण्याची जाणीव कै. विनायकराव पाटील व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्याने दिली.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी फुले-शाहू-आंबेडकर यांनी घातलेला आदर्श सर्वांसमोर ठेवला. जातीभेद, सामाजिक-आर्थिक विषमता, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी आणि अज्ञानामुळे विस्कळीत झालेल्या बहुजन समाजाची उन्नती शिक्षणाच्या माध्यमातून साकारण्याचे महत्त्वपूर्ण योगदान संस्थेचे आहे. ही संस्था गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा विस्तार लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता अन्य पाचही जिल्ह्यात झाला आहे.
28 डिसेंबर 1968 ला वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी विनायकरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या काळात निश्चितच दिशादर्शक आहे. अशा थोर क्रांतिसिंहास कोटी-कोटी प्रणाम!

0 comments:

 
Top